शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील: बहुजन शिक्षणाचे आधारस्तंभ,,

महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात ‘रयत शिक्षण संस्थेचे’ संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. ज्या काळात शिक्षण केवळ ठराविक वर्गापुरते मर्यादित होते, त्या काळात अण्णांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि दलितांच्या घरापर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचवण्याचे महान कार्य केले.
जन्म आणि बालपण
भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील होते. लहानपणापासूनच त्यांच्यावर महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.
रयत शिक्षण संस्थेची स्थापना
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही, हे अण्णांनी ओळखले होते. या विचारातूनच त्यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील काले या गावी ‘रयत शिक्षण संस्थेची‘ स्थापना केली. ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे सूत्र त्यांनी समाजाला दिले.महत्त्वाचे योगदान आणि
वैशिष्ट्ये
कमवा आणि शिका (Earn and Learn):
गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी ही अभिनव योजना सुरू केली.
जातिभेद निर्मूलन:
त्यांनी सुरू केलेल्या वसतिगृहांमध्ये सर्व जाती-धर्माचे विद्यार्थी एकत्र राहत आणि जेवत, ज्यातून त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला.
रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील:
अण्णांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी मोलाची साथ दिली. त्यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने विकून वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची सोय केली होती.
पुरस्कार आणि सन्मान
महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना प्रेमाने ‘कर्मवीर’ ही उपाधी बहाल केली. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारने १९५९ मध्ये त्यांना ‘पद्यभूषण‘ पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय ‘डी.लिट’ पदवी प्रदान केली.
९ मे १९५९ रोजी या थोर शिक्षणमहर्षीचे निधन झाले. आज रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाखाली लाखो विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत असून अण्णांचे कार्य आचंद्रसूर्य प्रेरणा देत राहील.




