कल्याण रेल्वे भरती मारहाण प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहाजण निर्दोष

कल्याण रेल्वे स्थानकावर २००८ मध्ये रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनसे अध्यक्ष यांच्यासह सहाजणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. मुख्य न्यायिक दंडाधिकारी ए. व्ही. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.
रेल्वे भरती परीक्षेसाठी राज्याबाहेरून आलेल्या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना २००८ मध्ये घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील दोन आरोपींचा मृत्यू झाल्याने उर्वरित सहाजणांविरोधात सुनावणी सुरू होती.
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. बचाव पक्षाकडून अॅड. शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सहाजी शिंदे यांनी बाजू मांडली, तर सरकारी पक्षाकडून अॅड. प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला. अखेर पुराव्याअभावी तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या निकालानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.




